राहाता : तेलंगाणामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. असे म्हटले जाते. प्रत्यक्ष किती भाव मिळतो याचा अनुभव जिल्हयातील एका शेतकर्याला आला आहे.
कन्नड मधून अनेक शेतकऱ्यांनी कांदा तेलंगाणात विक्रीस नेला होता. त्यांचा व्हीडीओ पाहून पुणतांब्यातील शेतकर्याने कांदा विक्रीस नेला. अन् त्यांना पस्तावाच आला.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने आता महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. विविध जिल्ह्यात “अबकी बार किसान सरकार” असे आशयाचे होर्डिंग्ज लावून बीआरएसची जोरदार जाहिरातबाजी सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी कन्नडचे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ व्हायरल करत तेलंगाणामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असून कन्नड मधून अनेक शेतकऱ्यांनी कांदा तेलंगाणात नेल्याचे म्हटले होते.
शिर्डी जवळील पुणतांबा गावाने ऐतिहासिक असा शेतकरी संप पुकारला होता. याच गावातील रहिवासी शेतकरी योगेश वाणी यांनी काल कन्नडचे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडिओ पाहून आपला ५०० गोणी कांदा हैद्राबाद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये जाधव यांनी तेलंगणात कांद्याला १८०० ते २००० पर्यंत भाव मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी योगेश वाणी यांना प्रत्यक्षात ८०० ते १ हजार रुपयांचा भाव मिळाला असल्याचे म्हटले आहे.

Post a Comment