चांदा : आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईल आणि टीव्ही मध्ये मुलं रमत असतानाच नेवासा तालुक्यातील चांदा येथील युवक निखिल मच्छिंद्र दहातोंडे यांनी तब्बल 65 दिवस सायकलवर केलेल्या अयोध्या वारीचा उपक्रम आजच्या काळातील युवकांसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी केले आहे.
येथील वीस वर्षीय तरुण निखिल दहातोंडे यांनी आयोध्देतील प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सायकल वरून जाण्याचा निर्णय घेतला.
तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवासासाठी त्याने आपल्या आई-वडिलांची परवानगी घेऊन 30 डिसेंबर रोजी चांदा येथून आयोध्येला प्रस्थान केले. मजल दर मजल करत 16 जानेवारीला अयोध्या येथे पोहोचला.
22 जानेवारीला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर त्याने तेथून पुढे काशी, वृंदावन ,उज्जैन, ओंकारेश्वर नाशिक ,शिर्डी , देवगड असा सायकल प्रवास करत काल चांदा येथे आगमन झाले.
आज सकाळीच पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा गौरव करत त्याने केलेल्या या अविस्मरणीय कामगिरीचे कौतुक केले.
Post a Comment