अहिल्यानगर ः शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शाळांच्या तुकड्या कमी होऊ लागल्या असून शिक्षक अतिरिक्त ठरू लागलेल आहे. त्यामुळे तुकडी वाचविण्यासाठी काही शाळांनी बाहेरील गावातून विद्यार्थी शाळेत आणून तुकडी टिकविण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे करताना नियमांना तिलांजली देण्यात आलेली आहे. नियमबाह्य पध्दतीने मुलांना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत आणले जात आहे. याकडे शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष झालेले आहे.
जिल्हा परिषदेसह अनुदानीत माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा पट दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा पटाचा आलेख उंचावत आहे. जिल्हा परिषदेसह अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये गुणवत्ता ढासळलेली आहे म्हणून पट कमी झालेला नाही. यातील काही शाळांचा पट व्यवस्थित आहे. परंतु तेथे सुविधा पुरेशा नसल्याचा परिणाम आहे. तसेच काही शाळांमध्ये सुविधा आहे, मात्र शिकविले जात नसल्याने विद्यार्थ्यांचा पट कमी झालेला आहे. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी झालेला आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांमधील तुकड्या कमी होण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शिक्षकांची संख्या कमी झालेली आहे. शिक्षक कमी झाल्यानंतर इतर शिक्षकांवर कामाचा ताण वाढणार आहे. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आता काही शाळांमधील मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी बाहेरील गावातून विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश दिलेले आहे.
हे प्रवेश देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळेत आणण्याची व घरी सोडण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतलेली आहे. त्यासाठी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे. काहींनी स्कूलबस, जीप तर काहींनी पीक सारखी वाहने खरेदी केलेली आहे.
त्यातून धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यांना बसवून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असतानाही विद्यार्थी शाळांमध्ये आणले जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी आणत असलेल्या वाहनांवर प्रशिक्षित वाहन चालक नसल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे पालकांमधून शाळांसह शिक्षण विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रश्नी शिक्षण विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी शाळांना भेटी देत आहे. परंतु या भेटी जेवणावळीपुरत्याच राहत आहेत. शाळांमधली शिक्षण पध्दतीवर कामकाज व गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरु आहे. अधिकारी येतात अन् जेवनावळी करून जातात, असेच आता शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बोलत आहेत.
खासगी वाहनातून नियमबाह्य पध्दतीने विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतूक नियमांना अनेक शाळांनी तिलांजली दिलेली आहे. अशा शाळा व त्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने आणले जाते. याबाबतची कोणती माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला नाही. याबाबत माध्यमिक विभागाशी संपर्क साधला असता आमच्याकडे फक्त शाळा व विद्यार्थी संख्येची नोंद असते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पगारासंदर्भात माहिती असते. इतर माहिती आम्हाला नाही, असे माध्यमिक शिक्षण विभागातून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. (क्रमशः)
Post a Comment