नेवासा : नेवासा शहरात महावितरणच्या वीज खांबांवरून टाकण्यात आलेल्या इंटरनेटच्या वायरींचा प्रश्न आता केवळ सुरक्षिततेपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्यावरून शहरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तेजवार्ता न्यूज पोर्टलने हा प्रश्न समोर आणल्यानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून, "या इंटरनेट जाळ्यामागे कोणाचे पाठबळ आहे?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
काही नागरिकांचा दावा आहे की, संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादाराला प्रभावशाली राजकीय व्यक्तींचे पाठबळ असल्याची चर्चा शहरात होत आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचे म्हणणे आहे की, जर कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीचे संबंधितांशी संबंध असतील, तर त्यांनीही पुढाकार घेऊन धोकादायक वायरी तातडीने हटविण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.
"माजी लोकप्रतिनिधी नेवाशात राहत नसतील, पण या धोक्याचा सामना रोज नेवासकरांनाच करावा लागत आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, तेजवार्ता न्यूज पोर्टलने हा प्रश्न सातत्याने मांडल्यामुळे अनेक नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन निर्भीडपणे आवाज उठवल्याबद्दल पोर्टलचे कौतुक होत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. नेवाशातील मूलभूत प्रश्न, सार्वजनिक सुरक्षा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अशाच प्रकारे लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, आता हा विषय चर्चेपुरता न राहता महावितरण, नगरपंचायत आणि संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादार यांनी संयुक्तपणे तातडीने धोकादायक वायरी हटविण्याची मोहीम हाती घ्यावी. अन्यथा भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतील, अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.


Post a Comment