अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः कोरोना काळात आमदार नीलेश लंके यांनी चांगले काम केलेले आहे. या कामामुळे त्यांचा तालुक्यासह जिल्ह्यात चांगलाच बोलबाला होत असून तरुणाईच्या गळ्यात ते ताईत बनलेले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून तेच उमेदवार असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. लंके यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेले नाही. तसेच राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांकडून तसा उल्लेखही करण्यात आलेला नाही. मात्र विरोधकांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली असून टीका टिपन्न सुरु केली आहे.
हे एकदा वाचा ः कर्जतमध्ये भाजपातील जुन्या व नव्यांचा मेळ कसा होणार
कोरोना काळात सर्वच जनता त्रस्त झालेली होती. अनेकजण बेड मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींना दूरध्वनी करून मदतीची याचना करीत होते. या काळात लोकप्रतिनिधीही रुग्णालयांमध्ये बेड नसल्यामुळे हतबल झालेले होते. काहींना बेड मिळत नसल्यामुळे इतर जिल्ह्यात जाऊन उपचार घ्यावे लागले. जिल्ह्यात लवकर बेड न मिळाल्याने काहींना जीवही गमविण्याची वेळ आलेली आहे. अशा जिल्ह्यात एक दोन घटना घडलेल्या आहेत.
अशाच काळात आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे कोविड सेंटर सुरु करून रुग्णांना आधार दिला. या कोविड सेंटरला हजारो हातांनी मदत केलेली असली तरी प्रत्यक्षा कोविड सेंटर करून रुग्णांना आधार देण्याचे काम लंके यांनी केलेले आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्या या कामाचे कौतुक सध्या होत आहे. या कौतुकामुळे ते विरोधकांच्या हिटलिस्टवर आलेले असून त्यांच्यावर आता टीका टिपन्नी सुरु झालेली आहे.
कोरोना काळात आमदार लंके यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पालकमंत्री करण्यात यावे, अशी मागणी जनतेमधून होत होती. त्यावर काय तो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. मात्र जनतेने आपल्या भावनांना वाट मोकळीक करून दिलेली होती. त्यानंतर आता जनतेनेच आपल्या मतदार संघाचा विकास व्हावा, अशी अपेक्षा धरून त्यांना खासदार करण्यात यावे, अशी मागणी सुरु केलेली आहे. प्रत्यक्षात आमदार लंके यांनी आपल्याला खासदारकीची निवडणूक लढवायची आहे, अशी घोषणा केलेली नाही. तसेच राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने तसे वक्तव्य केले नाही. त्यांनी अडचणीच्या काळात फक्त काम केलेले आहे.
हेच काम त्यांना लोकप्रियता मिळवून देत आहे. तसेच त्यांना या कामाच्या बदल्यात अनेक ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहे. या पुरस्कारांचे फोटो त्यांच्याकडून म्हणाव किंवा त्यांच्या हितचिंतकाकडून व्हायरल करण्यात आलेले आहे. जनतेने त्यावर अनेक प्रतिक्रिया देऊन समाजमाध्यमावर व्हायरल केलेले आहे.त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असतानाच विरोधकांनी त्यावरही आता टीका टिपन्न सुरु केलेली आहे. यामध्ये लंके यांनी आपले फोटो व्हायरल करावे, याबाबत जाहीर वक्तव्य केले नाही. तसा संदेश कोठे पाठविलेला नाही. जनतेला वाटले म्हणून ते वेगवेळ्या संदेश तयार करून ते व्हायरल करीत आहे.
आमदार लंके यांची लोकप्रियता वाढत असल्याने ती विरोधकांच्या डोळ्यात खूपत असून त्यामुळे त्यांच्यावर टीका-टिपन्नी सुरु झाल्याची चर्चा आता लोकसभेच्या दक्षिण मतदार संघातील जनतेत सुरु झालेली आहे.त्यामुळे विरोधकांनी कोरोना काळात कोणी काय केले यावर बोलण्यापेक्षा आपण जनतेसाठी काय केले हे स्पष्ट करणे आता महत्वाचे ठरणार आहे. कोरोना काळात केलेल्या कामाची पावतीच आता आगामी निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींना मतदाराच्या रुपाने मिळणार आहे.
विरोधकांकडून सुरु झालेल्या टीका-टिपन्नीला आमदार लंके आता आगामी काळात कसे उत्तर देतात, हे पाहणे उत्स्कुतेचे ठरणार आहे. शब्दातून ते बोलतात की कामातून विरोधकांचे तोंड गप्प करतात, याकडे दक्षिण लोकसभा मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागलेले आहे.
Post a Comment