जगताप यांनी लावली उमेदवारी पणाला... जिल्ह्यात चर्चेला उधाण...

नगर ः अहमदनगर लोकसभा मतदार संघातील जागा लढविण्यावर शरद पवार गट ठाम  असून उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण साथ देऊन उमेदवार निवडून आणतील, असा शब्द देत आहेत. मात्र माजी आमदार राहुल जगताप यांनी तर आपली आगामी विधानसभेची उमेदवारीच पणाला लावली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीच होणार आहे.


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर  व शिर्डी मतदारसंघातील आढावा बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आदी उपस्थित होते. 

या बैठकीत आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, डाॅ. अनिल आठरे आदींच्या नावाची चर्चा झाली.  यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नावावर एकमत झालेले आहे. परंतु ऐनवेळी जर बदल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

लोकसभेसाठी उमेदवार कोणीही द्या. खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू. श्रीगोंद्यातून उमेदवाराला एक जरी मत कमी पडले तर आपल्याला विधानसभेची उमेदवारी देऊ नका, असे जगताप यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याची जिल्हाभर चर्चा सुरु झालेली आहे.

जगताप यांच्या या वक्तव्यामुळे ते पक्षाशी किती एकनिष्ठ आहेत, हे स्पष्ट होत आहे. यावरून जगताप यांचा तालुक्यात संपर्क असून आगामी काळात राष्ट्रवादीचाच उमेदवार खासदार होईल, अशी त्यांना आशा असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.  

जगताप यांनी घेतलेली भूमिका इतर उमेदवारांनी घेऊन आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरवात केली तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीला मिळण्यास अवघड नसून विजय राष्ट्रवादीचाच होईल, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post